बाबुराव पेंटर यांनी कोल्हापूरमध्ये मराठी चित्रपटसृष्टीचा पाया घातल्याच्या घटनेला आता १०० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या इतिहासाचे स्मरण करणारा हा लेख...
.......
भारतात चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा पाया १९१३ मध्ये घातला; पण, मराठी चित्रपटसृष्टीचा पाया कलानगरी कोल्हापूर शहरात बाबुराव पेंटर यांनी घातला. त्याला १०० वर्षे पूर्ण झाली, याचा अभिमान मराठी भाषकांना आणि कलाकारांना नक्कीच आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नाटकाचे पडदे रंगवण्यासाठी बाबुराव पेंटर आणि त्यांचे मावस बंधू आनंदराव मुंबईला वास्तव्यासाठी गेले असताना, त्यांनी अनेक मूकपट पाहिले. त्यांनी मूकपटांच्या निर्मितीचा निर्धार केला; पण त्यासाठीचे तंत्रज्ञान मात्र त्यांना माहिती नव्हते. कोल्हापुरात परतल्यावर आनंदरावांनी दोन वर्षे परिश्रम घेऊन स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार केला आणि १० डिसेंबर १९१७ रोजी गायिका तानीबाई कागलकर यांच्या आर्थिक साह्याच्या बळावर सध्याच्या केशवराव भोसले नाट्यगृहात (तेव्हाचे पॅलेस थिएटर) महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी डेक्कन चित्रपटगृह चालवायला घेतले. १९१८मध्ये बाबुराव पेंटर यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन सैरंध्री या पौराणिक मूकपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ केला. मूक चित्रपटाचे तंत्रज्ञान त्यांनी स्वत:च आत्मसात केले होते. पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात ‘सैरंध्री’ हा महाराष्ट्र फिल्म कंपनीचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि बाबुराव पेंटर-महाराष्ट्र फिल्म कंपनीला प्रचंड प्रसिद्धी-नावलौकिक मिळाला. हा चित्रपट पाहून लोकमान्य टिळक यांनी बाबुरावांना ‘फिल्मकेसरी’ या उपाधीसह सुवर्णपदकाने सन्मानित केले होते.
महाराष्ट्र फिल्म कंपनीत व्ही. शांताराम, दामले मामा, फत्तेलाल आणि धायबर हे बाबुराव पेंटर यांचे सहकारी होते. बाबुराव पेंटर यांच्या तालमीतच या चौघांची जडणघडण झाली होती. महाराष्ट्र फिल्म कंपनीचा स्वदेशी कॅमेरा आगीत भस्मसात झाला. बाबुरावांनी परदेशातून कॅमेरा मागवून भक्त दामाजी, सिंहगड, मायाबाजार, सती पद्मिनी, कृष्णावतार, सावकारी पाश अशा चित्रपटांची निर्मिती केली. हे चित्रपट देशात प्रचंड चालले आणि गाजले. कोल्हापूर हे मराठी चित्रपटांचे माहेरघर झाले. पुढे १९३१मध्ये फत्तेलाल, व्ही. शांताराम, दामले मामा, धायबर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडून प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली आणि भारतात प्रभात युगाबरोबरच चित्रपटसृष्टीच्या नव्या बोलपट युगाचाही प्रारंभ झाला. बोलपटांचे युग सुरू झाल्यावर बाबुरावांनी उषा, सावकारी पाश, प्रतिभा या चित्रपटांची निर्मिती केली. पुढे ते महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९४७मध्ये राजकमल या व्ही. शांताराम यांच्या चित्रपट संस्थेने त्यांच्यावर राम जोशी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली होती; पण हा चित्रपट त्यांच्या दिग्दर्शनाखाली पूर्ण झाला नाही. बाबुराव फक्त चित्रकार, नेपथ्यकार, चित्रपट निर्माते नव्हते, तर चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले दिग्दर्शन, पटकथा लेखन, तंत्रज्ञान, संकलन यातही कुशल होते.
त्यांच्याच तालमीत व्ही. शांताराम यांच्यासह ‘प्रभात’चे संस्थापक चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात तरबेज झाले होते. मराठी चित्रपटसृष्टीची जननी असलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने, चित्रपटक्षेत्रात अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, कथाकार यासह तंत्रज्ञांना प्रशिक्षित केले. पुढे प्रभात फिल्म कंपनीने पुण्याला स्थलांतर केल्यावर, राजाराम महाराजांच्या प्रोत्साहनाने कोल्हापुरात शालिनी स्टुडिओ आणि छत्रपती सिनेटोन या चित्रपट निर्मितीच्या दोन संस्था स्थापन झाल्या. काळाच्या ओघात कोल्हापूरचे जयप्रभा आणि शालिनी हे स्टुडिओ बंद झाले. कोल्हापूरची चित्रपट निर्मितीची वैभवी परंपरा खंडित झाली.
मोरेवाडीच्या माळावर महाराष्ट्र सरकारने नवी चित्रनगरी सुरू केली असली, तरी कोल्हापुरात मराठी चित्रपटांची निर्मिती फारशी होत नाही; पण मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे युग शंभर वर्षांपूर्वी याच कोल्हापूर नगरीत सुरू झाले, या इतिहासाचे स्मरण करायला हवे!
- वासुदेव कुलकर्णी